संघर्ष मानवी मूलभूत हक्काचा..……!
युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी महाड मुक्कामी अस्पृश्यांचा चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी चवदार तळ्याचा सत्याग्रह करुन सामाजिक क्रांती केली. महाड चवदार तळे सत्याग्रह हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नव्हता तर तो मानवी मुलभूत हक्कांसाठी होता. पाण्यासारख्या मुलभूत प्रश्नी सुध्दा इथे अमानवी व्यवस्थेविरोधात बाबासाहेबांना वैचारिक संघर्ष करावा लागला. ज्या ठिकाणी कुत्रे, मांजरे अन्य पशू देखील पाणी पिऊ शकतात अशा ठिकाणी मात्र माणसाकडूनचं माणसाला पाणी पिण्यास मज्जाव केला जात होता आणि म्हणून बाबासाहेबांनी २० मार्च १९२७ रोजी भारतीय सामाजिक क्रांतीचा पहिला सुरुंग महाड येथील चवदार तळ्याचं पाणी चाखून लावला. आणि आंबेडकरी चळवळीच्या इतिहासात महाडची क्रांतीभूती तर २० मार्च क्रांती दिन म्हणून नोंद झाली.
महाड चवदार तळे सत्याग्रहाला संबोधीत करतांना बाबासाहेब म्हणतात, “हा केवळ पाणी प्राशन करण्याचा माझा हेतू नाही तर समाजातील सर्वचं माणसे सारखीचं आहेत. अमुक वरच्या जातीचा, तमूक खालच्या जातीचा असा जातीभेद कशाला ? हा संगर केवळ पाण्यासाठी नसून तो मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे. चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने आम्ही अमर होऊ अशातला भाग नाही. आज पावेतो चवदार तळ्याचे पाणी प्यायलो नव्हतो तर तुम्ही आम्ही काही मेले नव्हतो. चवदार तळ्यावर जावयाचे ते केवळ त्या तळ्याचे पाणी पिण्याकरीता जावयाचे नाही. तर इतरांप्रमाणे आम्हीही या समाजातील माणसे आहोत हे सिद्ध करण्याकरीताचं त्या तळ्यावर आपणास जावयाचे आहे.”
बाबासाहेबांनी चवदार तळ्याचं पाणी प्राशन केल्याने तळे अपवित्र झाले हे रुढीवादी जातीय व्यवस्थेला सहन झाले नाही. त्यांनी हजारों अस्पृश्यांवर लाठ्या काठ्यांनी हल्ला केला, त्यांच्या जेवणात माती मिसळली आणि तळे बाटले म्हणून तळ्यात दही, शेण आणि गोमुत्र टाकून तळ्याचे शुद्धीकरण करण्यात आले. म्हणजे माणसांनी तळ्याचं पाणी प्राणी प्राशन केले म्हणून तळे बाटले ते तळे दही, शेण आणि गोमुत्रांने पवित्र केले. एवढेच नाही तर, १९२३ मध्ये एका कायद्यानुसार सार्वजनिक तलाव आणि विहिरी अस्पृश्यांसाठी खुले करायचा महाड नगर परिषदेने १९२६ मध्ये घेतलेल्या निर्णयाला जातीयवादी उच्चवर्णीयांनी कडाडून विरोध केला. अशा दळभद्री, मनुवादी विकृत मानसिकतेला काय म्हणावे ? महाड नगर परिषदेने १९२६ मध्ये जरी सार्वजनिक तलाव आणि विहिरी अस्पृश्यांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला तरी, अस्पृश्यांना मनाईचं होती. म्हणजे, नैसर्गिक साधन संपत्तीवरही यांचीचं मालकी ? माणसांने पाण्याला स्पर्श केला म्हणून ते अपवित्र झाले, बाटले गेले आणि प्राण्यांचे मुत्र, शेणांपासून ते पवित्र होत असेल तर अशा लोकांमध्ये आणि प्राण्यांमध्ये काय फरक असू शकेल ? आजही जाती धर्माच्या नावाखाली माणूस माणसावरचं अन्याय अत्याचार करीत आहे, शोषण करीत आहेत.
जो पर्यंत शोषण व्यवस्था अस्तिवात असेल यो पर्यंत हा
संघर्ष मानवी मुलभूत हक्कांचा आजही चालूचं राहिल अखंडित…!
-मिलिंद कांबळे चिंचवलकर
प्रस्तुत लेखक आंबेडकरी चळवळीतील विचारवंत आणि अभ्यासक आहेत.