वंचित बहुजन आघाडी आघाडीलाच नव्हे तर युतीला देखील खाणार !– वैभव छाया
वंचित बहुजन आघाडी ही काँग्रेस प्रणीत आघाडीची मते खाणार असा आरोप होतो आहे. तो खराच आहे . वंचित बहुजन आघाडी भाजप प्रणीत आघाडीची मते खाणार आहे असाही आरोप होतोय. तो ही खराच आहे !!
हे समजून घेण्यासाठी तुम्हा आम्हा सर्वांना 2009 आणि 2014 च्या आकडेवारीवर अभ्यास करावा लागेल.
2014 च्या निवडणूकांत काँग्रेस आघाडीकडून नाराज झालेली मराठा मते बीजेपीला पडली होती. ती हळूहळू काँग्रेसकडे सरकली आहेत. त्यातील एक मोठा भाग हा भाजप आणि काँग्रेस या दोघांवर नाराज आहे. तो वंचित आघाडीकडे सरकेल. याला मराठा आरक्षण प्रकरणात दोघांनी दिलेले गाजर कारणीभूत आहे. या वोट कटिंगला सर्वथा काँग्रेस आघाडी आणि भाजप आघाडी जबाबदार आहे. त्यासाठी स्वतःच्या चूकांचे खापर इतरांवर फोडू नये.
याच निवडणूकीत काँग्रेसवर नाराज असेलला मागासवर्ग, धनगर, भटके आणि मुस्लिम मतदारवर्ग हा जो काँग्रेसच्या विरोधात वोटिंग केलेला होता तो भाजप आणि काँग्रेस या दोघांवर नाराज आहे. भाजपने केलेले अत्याचार आणि काँग्रेसी राजकारण्यांनी केलेले दूर्लक्ष त्यासाठी कारणीभूत आहेत. ही स्विंग होणारी मते वंचित आघाडीकडे वळत आहेत.
मुद्दा असा…. मागास आणि मुस्लिम या मतांनी काँग्रेसला एकगठ्ठा मतदान न केल्याने भाजपाचे फावले होते. ती मते भाजपाला न मिळण्याऐवजी भाजपविरोधात जाणार आहेत. एक प्रकारे या मतांनी त्यांचा हक्काचा मतदारसंघ आणि राजकारण शोधले आहे.
आजवर या मागास वा वंचित घटकांना विश्वासाचा पर्याय नव्हता. म्हणून ती मते तिथे जात होती. पण आता पर्याय आहे तर त्याला वोटकटूआ म्हणणे हा करंटेपणा आहे.
स्वतःचा हक्क शोधणे, तो बजावणे हे प्रत्येकाचे संवैधानिक हक्क आहेत. त्यामुळे स्वतःच्या चूकांचे खापर इतरांवर फोडण्यात अर्थ नाही. मागास व मुस्लिम वर्गाची मते गृहित धरण्याचा करंटेपणा ज्यांनी केला आहे त्यांच्याच विरोधात वंचित बहुजन आघाडी मते घेऊन उभी राहणार आहे.
नीट विचार करा. मग ठरवा नेमके आरोप कुणावर आणि कसे करायचे ते.
एक प्रकारे काँग्रेस आघाडीपेक्षा वंचित आघाडी भाजप सेनेचे नुकसान अधिक करते आहे. पण, सत्तेचा वाटा सगळा आमच्याच ताटात हवा ही सरंजामी मानसिकता न सोडवणाऱ्यांनाच असे आरोप करावेसे वाटतात.
संधीचा समान हक्क प्रत्येकालाच मिळायला हवा. वंचित आघाडी राजकारणात बहुजनांची इक्विटी तयार करत आहे. ही इक्विटी काही केल्या तयार झालीच पाहीजे.
सर्व समर्थकांना एकच सांगणे… युक्तीवाद करताना भावनिक नव्हे तर आकडेवारीवर, फॅक्ट्सवर करायची असते. लोकांना कनेक्ट आणि कंनविंस करूनच विजय साकार होत असतो.या इक्विटीसाठी धावलंच पाहीजे.
– वैभव छाया
सौजन्य : LOKJAGAR.in