माणसाला एक चेहरा असतो. परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र दोन चेहर्याचे वाटतात.
इंदू मिल प्रश्न आणि भीमा -कोरेगाव हिंसक बनल्यानंतर त्यांना पुरोगामी विचारधारेचा पुळका आला. परंतु भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव हिंसाचार उफाळून येण्यामागे संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे हेच जबाबदार असल्याचे मत व्यक्त केल्यानंतर खातरजमा करण्याऐवजी भिडे यांना क्लिनचीट दिली. कारण काय असू शकते? भिडे हे कट्टर हिंदुत्ववादी असल्याने त्यांना झुकते माप! या दरम्यान फडणवीस यांनी एक महत्वपूर्ण घोषणा केली, ती अशी की, ” महाराष्ट्र फुले-शाहू-आंबेडकर या महामानवांच्या विचारांचा आहे. या विचारधारेला जो कोणी नख लावण्याचा प्रयत्न करेल, ते आम्ही खपवून घेणार नाही.
दरम्यानच्या काळात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती करायची की नाही यावर सेना-भाजपमध्ये तू तू मे मे सुरु झाली. सेनेतर्फे प्रवक्ते म्हणून संजय राऊत भूमिका मांडत असत. तर सेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या दैनिकातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपवर निशाण साधताना भाजपच्या धोरणांची खिल्ली उडवण्याचा काम केले. यावेळी सेनेला जशास तसे उत्तर दिले ते फक्त अॅड. शेलार आणि किरीट सोमय्या यांनीच. दोन वर्षे हे नेते सेनेच्या टिकेचा सामना करीत होते. आज ते कोठेच दिसत नाहीत. अर्थात तो त्यांच्या पक्षाचा भाग असल्याने अंदरकी बातविषयी आपल्याला देणेघेणे नाही.
भाजपच्या कार्यपद्धतीवर सतत आक्षेप घेणारी शिवसेना, भाजप सेना आमदार-मंत्र्यांना निर्णय प्रक्रियेत थारा देत नाही असा आरोप करून 2019 च्या निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे किमान शंभर वेळा तरी बोलले असतील! परंतु भाजप सत्तेसाठी किती लाचार होतो हे आगस्टमध्ये पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीला भेट दिली तेव्हाच स्पष्ट झाले. युतीची आश्वासने देण्यात आली. शहरांची गाडी सांताक्रूझ विमानतळावर पोहचत नाही तोच आम्ही स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे पत्रकारांशी बोलतांना ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्पष्ट केले. राऊत महाशय मात्र आता तोंडात बोळा घालून बसलेले दिसतात.
सुरवातीला जागा वाटपावरून धुसफूस झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराचा प्रश्न उकरून काढून भाजपला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. तरीही शिस्तप्रिय भाजपने सहन केले. भाजपकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने यापुढे युती फक्तहिंदुत्वावरच होईल असा ठाकरे यांनी दम भरला. फडणवीस महोदय भारत नावाच्या राष्ट्राचे समर्थक आहेत. तर मित्र पक्ष असलेली शिवसेना धर्मप्रमाण्याचा आग्रह धरताना, ‘हिंदुस्तान’ या शब्दावर जोर देत, हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असल्याचे मत व्यक्त करते. परंतु कोण काय बोलतं याला भाजपवाले किती किंमत देतात हे सेनेच्या लक्षात येत नाही. याचे कारण शिवसेनेचा लोकशाहीवर अजिबात विश्वास नाही.संविधानावर तर नाहीच नाही.
9 इस्ट 2018 रोजी दिल्लीच्या जंतर मंतर रोडवर रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांनी संविधानाची प्रत जाळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी लोकशाही मुर्दाबाद, संविधान मुर्दाबाद, डॉ.आंबेडकर मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. देशभरात संघाविरोधी वातावरण निर्माण झाले. प्रधानमंत्री मोदी-शहा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे ठिकठिकाणी जाहीर दहन करण्यात आले. परंतु सेनेने या प्रकरणी चुप्पी साधली. संविधान हा कोणत्याही देशाचा प्राण असतो. जात-धर्म प्रामाण्याचे समर्थक असलेल्या संघटनेशी केवळ मतासाठी युतीचे मंगळसुत्र गळ्यात अडकवून धर्माचे पालन करावे असे वाटत असेल तर यासारखी दुसरी प्रतारणा नाही. अर्थात सारे विधीनिषेध धाब्यावर बसविण्यासाठी सभ्यतेच्या अंगरखा बाजूला ठेवून तो जर चांडाळचौकडीचे रूप धारण करीत असेल तर मात्र ती समस्या होऊन राहते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र आतापासूनच डघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. गुरूवार दिनांक 14 मार्च 2019 रोजी अमरावतीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी “शिवसेना -भाजप युती म्हणजे फेविकॉलच्या जाहिरातीमधील हाथी का जोड असल्याचे मत व्यक्त केले.
2015-16 मध्ये कडोंमनपाच्या निवडणुकीत जे लोक खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांवर टीका करत होते, तेच आतासत्तेसाठी गळ्यात गळा घालत आहेत. धन्य ते नेते आणि त्यापक्षाचे समर्थक म्हणवणारे कार्यकर्ते!!
-गुणाजी काजीर्डेकर
प्रस्तुत लेखक हे जेष्ठ संपादक आहेत .