महात्मा गांधी यांचे नातू डॉ. राजमोहन गांधी म्हणतात
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अड प्रकाश आंबेडकरांनी मोदीविरोधकांचे नेतृत्व करावे :
( सरकार नामा मधून सभार )
देश सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. जात, धर्म, लिंग यावरून काही समाजाला लक्ष्य केले जात आहे. राज्यघटनेतील मूलभूत मूल्यांची चौकट धोक्यात आलेली असताना मोदी सरकारच्या विरोधातील आंदोलनाचे नेतृत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी करावे, असे आवाहन ज्येष्ठ लेखक व महात्मा गांधी यांचे नातू डॉ. राजमोहन गांधी यांनी नागपुरात केले.
ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या दक्षिणायन या चळवळीच्या ‘समास – 2018’ या उपक्रमाचा समारोप नागपुरात झाला. सेवाग्राम येथून निघालेल्या उपक्रमाचा समारोप नागपुरातील दीक्षाभूमीवर झाला. यावेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे होते. डॉ. राजमोहन गांधी व भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. गांधी म्हणाले, ”प्रकाश आंबेडकरांना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात तसेच देशात आहे. देशातील गांधी-आंबेडकरांच्या विचारावर विश्वास असणाऱ्या सर्व राजकीय पक्ष व पुरोगामी चळवळींनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. या सर्व घटकांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू म्हणून आता प्रकाश आंबेडकरांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. मी तुमच्यापेक्षा वयाने खूप मोठा आहे. या नात्याने आपल्याला जबाबदारी देण्याचा मला अधिकार आहे.”
राज्यघटनेवर व स्वातंत्र्यावर हल्ले होत आहे. वेगवेगळ्या पक्षाचे व विचारांचे लोक खूप दुःखी आहेत. या सर्वांना एकत्र आणण्याची व त्यांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी आता प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या खांद्यावर घ्यावी, असेही आवाहन त्यांनी केले.