एका बुजुर्ग पत्रकार मित्राचा फोन आला.
महाराष्ट्रातील काँग्रेस मृतवत आहे, राष्ट्रवादी काँग्रेस त्याचा फायदा घेते आहे, असं काय काय तो बोलत होता.
खूप वेळ मी त्याचं ऐकत होतो.
मी त्याला म्हटलं– काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सरदारांचे पक्ष आहेत. कोण पाच हजारी तर कोण दस हजारी.
ही मुळात घराणी आहेत. मात्र निवडणुक लढवण्यासाठी त्यांना कोणत्या तरी राजकीय पक्षाच्या चिन्हाची गरज असते.
त्यांची वैचारिक भूमिका, कार्यक्रम हा कुटुंबापुरताच असतो. पण त्या आधारावर लोकसभा वा विधानसभेच्या निवडणुका लढवता येत नाहीत. अपक्ष म्हणून निवडणुका लढवता येतात पण त्यामुळे सत्तेत पुरेसा वाटा मिळत नाही. म्हणून ते कोणत्या तरी पक्षाचं चिन्ह घेतात.
या घराण्यांच्या भांडणात आपण पडू नये.
भाजपला जवाहरलाल नेहरूंचा द्वेष आहे. गांधी घराण्यावर त्या पक्षाने निशाणा साधला आहे.
याचा साधा अर्थ असा की भारतीय स्वातंत्र्यलढा आणि त्यातून निर्माण झालेली मूल्यं म्हणजेच आधुनिक भारतीय राष्ट्र-राज्य, याचा वारसा नेहरू-गांधी घराण्याकडे आहे हे भाजपला समजतं. म्हणून ते त्यावरच हल्ला करत असतात.
नेहरू-गांधी घराण्याने आपलं जीवन स्टेकला लावलं आहे. डिस्कव्हरी ऑफ इंडिया, ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री यासारखे ग्रंथ लिहीणारे नेहरू काही वर्षं कारवासात होते. अमेरिका आणि रशिया या महाशक्तींच्या विरोधात त्यांनी अलिप्त राष्ट्र परिषद गठित केली होती.
काँग्रेसमध्ये असताना त्यांनी सशस्त्र क्रांतीकराक– हिंदुस्थान सोशॅसिस्ट रिपब्लिकन आर्मी, म्हणजे चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्ला खान आणि भगतसिंग यांना मदत केली होती. पत्रकार गणेश शंकर विद्यार्थी हे नेहरू आणि क्रांतीकारक यांच्यामधील दुव्याचं काम करत होते. गणेश शंकर विद्यार्थी यांची हत्या झाली. कानपूरयेथील हिंदू-मुसलमान दंगे मिटवण्यासाठी ते गेले होते. हिंदुत्ववादी हिंदूंनी गणेश शंकर विद्यार्थी यांच्यावर हल्ला केला.
सुभाषचंद्र बोस यांनीही नेहरूंचं नेतृत्व स्वीकारलं होतं.
अच्युत पटवर्धन यांना त्यांनी लिहीलेल्या पत्राची पीडीएफ माझ्या संग्रही आहे. मी अच्युत पटवर्धन यांचा सेक्रेटीर म्हणून एक महिना काम केलं आहे.
इच्छा असो वा नसो परंतु नेहरू-गांधी घराण्याला देशाची जबाबदारी घ्यावी लागली.
इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्या आंतरराष्ट्रीय कटातून घडल्या. नेहरू-गांधी घराण्यातील प्रत्येक सदस्य, म्हणजे काँग्रेसच्या मूल्यांचा वारसा स्वीकारणारा प्रत्येक सदस्य जिवावर उदार होऊन ती जबाबदारी स्वीकारतो.
महाराष्ट्र असो की अन्य कोणतंही राज्य अशी घराणी अपवादात्मक आहेत. उदाहरणार्थ बिजू पटनाईक. महाराष्ट्रातल्या घराण्यांनी एखादा साखर कारखाना, महाविद्यालय, विद्यापीठ अशी बारकी सारकी कामं केली आहेत. आपलं जीवन कधीही डावावर लावलेलं नाही.
अशा नेत्यांवर चर्चा करण्यात ऊर्जा आणि वेळ वाया घालवू नये. या घराण्यांमधील कोणतही व्यक्ती देशासाठी आपलं जीवन डावावर लावणार नाही.
आदिलशाही, निजामशाहीमध्ये सरदार लोक आपल्या निष्ठा अशाच बदलत होते. त्यांना त्यांचा सरंजाम महत्वाचा वाटत होता. राज्य निर्मितीची आकांक्षा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांकडे होती. ही आकांक्षा या सरंजामदारांकडे नाही.
फक्त मराठी प्रसारमाध्यमं या घराण्यांना अवास्तव महत्व देतात.
या घराण्यांची संख्या वाढली आहे मात्र त्यांची पॉवर कोणत्या प्लगमधून येते याकडे पाहा.
-मा सुनील तांबे
(सभार सुनील तांबे यांच्या FB वॉल वरून)