स्वांतंत्र्य मिळाल्यापासून मागील सात दशकांपासून भारतात लोकशाही आहे. या काळामध्ये संसदेच्या आणि राज्यांच्या विधानसभांच्या अनेक निवडणूका झाल्या. जगात जरी भारताची लोकशाही महान आहे असे समजले जात असले तरी भारतातील लोकशाहीच्या उणींवा आपणास माहित आहेत. कोणत्याही लोकशाहीचा आधारस्तंभ हा त्या देशातील निवडणूक पध्दत असते. लोकशाहीचे मुख्य उद्दीष्ठ हे समानता स्थापित करणे असून समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधीत्व मिळावे हे असते. त्यासाठी देशात वातावरण निर्माण करणे हे शासनाचे कर्तव्यच असते. जेंव्हा समाजातील सर्व घटकांना संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये योग्य प्रतिनिधीत्व मिळत नाही तेव्हा अशा प्रकारची लोकशाही जगाच्या दृष्टीने थट्टेचा विषय ठरतो. भारतातील लोकशाहीमध्ये बर्याच घटकांना योग्य प्रतिनिधीत्व मिळत नाही ही बाब आपल्याला मान्यच करावी लागेल. त्यामुळे भारताची लोकशाही जरी जगाचा दृष्टीने महान असली तरी सर्वांना सामावून घेणारी नाही. भारतीय लोकशाहीच्या या कमजोरीला दूर करणे अत्यंत गरजेचे आहे. ह्या सगळ्या प्रकाराला आपण वापरत असलेली निवडणूक पध्दत जबाबदार आहे.
भारतात आपण बहुमतीय निवडणूक पध्दत (Majoritarian Electoral System (MES)) किंवा या पध्दतीला प्रथमरेषा पार (First Past The Post (FPTP)) असे ही म्हणतात. FPTP मध्ये बहुतेक वेळा अल्पमत मिळूनही उमेदवार निवडणूकीत विजयी होतो. सत्तारूढ पक्ष हा साधारण बहुमतांनी ठरतो. अशा सत्तारूढ पक्षाला बर्याच वेळेस फार कमी टक्के मतं मिळालेली असतात. सध्याचा सत्ताधारी पक्ष, भारतीय जनता पक्ष याला २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत फक्त ३१% मतं मिळाली होती तर NDA च्या सर्व विजयी उमेदवारांना ला फक्त ३४.९३% मतं मिळाली होती याचा अर्थ असा होतो की ६५.०७% लोकांना शासनात / लोकसभेत कसलेही प्रतिनिधीत्व मिळाले नाही. हे लोकशाहीच्या मूळतत्वाशी विसंगत आहे. याच कारणामुळे जगातील बर्याच देशांनी FPTP ही मतदानाची पध्दत केंव्हाच वापरणे बंद केली आहे व त्या जागी प्रमाणबध्द निवडणूक पध्दत (Proportionate Electoral System (PES)) स्वीकारली आहे. PES मध्ये सर्वच मतदारांना आपला प्रतिनिधी संसदेमध्ये किंवा विधानसभेत पाठवता येतो व कोणाचेही मत व्यर्थ जात नाही. ह्या विषयावर पूर्ण भारतात चर्चा होणे हे अत्यंत गरजेचे आहे.
ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेऊन भारतासाठी सगळ्यात चांगली कोणती निवडणूक पध्दत ठरेल या विषयावर अभ्यास करण्यासाठी भारतातील काही विचारवंतांनी एकत्र येऊन भारतीय निवडणूक सुधार अभियानाची (Campaign for Electoral Reforms in India (CERI)) ऑक्टोबर २००८ मध्ये सुरुवात केली. मागील दहा वर्षात CERI ने ह्या विषयी भरपूर जनजागृती करून भारतीयांना PES चे महत्व पटवून दिले आहे. CERI चे कार्य भारतातील २२ राज्यांमध्ये सुरू आहे.
भारतातील सध्याच्या राजकीय स्थितीचा विचार करून आणि FPTP चे तोटे लक्षात घेऊन भारताची निवडणूक पध्दत या विषयावर CERI ने महाराष्ट्र पातळीवर एक चर्चासत्र आयोजित केले आहे. हे चर्चासत्र दिनांक ५ जानेवारी २०१९ रोजी खालील ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.
पत्ता:- २ रा मजला, मुंबई मराठी पत्रकार भवन, महापालिका मार्ग, आझाद मैदान, फोर्ट, मुंबई- ४००००१
वेळ – दुपारी २.३० ते सायंकाळी ७.००
या चर्चासत्राच्या दरम्यान “निवडणूक पध्दती : भारतासाठी प्रमाणबध्द प्रतिनिधीत्व पध्दत” (मूळ इंग्रजी लेखक – एम. सी. राज) या भाषांतरीत पुस्तकाचे अनावरण होणार आहे. या चर्चासत्रात संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक प्राध्यापक, राजकीय नेते, सामाजिक नेते आणि विचारवंत यांची उपस्थिती असणार आहे.
वरील चर्चा सत्रात भाग घेण्याकरिता अधिक माहिती साठी कृपया
डॉ. अनिल यादवराव गायकवाड सह-संस्थापक आणि राज्य समन्वयक – CERI, महाराष्ट्र राज्य यांच्याशी संपर्क करावा
91-98221141819 ई-मेल aygaikwad@gmail.com