ऐतिहासिक गर्दी रेकॉर्ड ब्रेक …..ऐतिहासिक शिव तीर्थ ओसांडले.
न्यायमूर्ती कोळसे पाटील यांनी नवं पेशवाई संपवण्याची दिली शपथ ….
भारतावर झालेल्या हल्ला हा पाकिस्तान ने केलेला अमानुष हल्ला….
पुलवामा दहशतवादी हल्ल्याला जबाबदार कोण ? वंचित बहुजन आघाडीच्या महासभेत पंतप्रधानांना खा . ओवेसी यांचा सवाल .
वंचितांचा लढा देशभर उभारू ………वंचितांची जर महाराष्ट्रात सत्ता आली तर देशभर हा लढा उभारू ……
अड आंबेडकर
सविस्तरपणे-
वंचित आघाडीच्या प्रचंड सभेने महाराष्ट्र हादरला
मुंबई – आजपर्यंत शिवाजी पार्क मैदान शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांच्यानंतर उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या सभांनी भरू शकले. मात्र आता भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने आज आपली ताकद दाखवली. वंचित आघाडीच्या शिवाजी पार्कवरील प्रचंड सभेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपा बिल्डर धार्जिणे असल्याची टीका करत त्यांच्याविरोधात लढणार असल्याची घोषणा केली. तसेच काँग्रेस आणि भाजपा हे दोघेही हिंदुत्ववादी असून काँग्रेस संघावरती कारवाई करायला तयार नाही. त्यामुळेच आमची निवडणूक युती अडकली आहे, असा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकरांनी केली.
आज मुंबईच्या ऐतिहासिक शिवाजी पार्कवर नवीन विक्रम नोंदविला गेला. यापूर्वी सतत 50 वर्षे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे शिवाजी तुडुंब भरवून सभा घेण्याचा मान होता. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजीपार्कवर विक्रमी सभा घेतल्या. मात्र आज प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीने गर्दीचे विक्रम मोडले. महाराष्ट्रातील 42 समाजाला आणि 18 पगड जातींना एकत्र आणून प्रकाश आंबेडकर यांनी आज वंचितांची नवी शक्ती निर्माण केली. त्यांनी आज शिवाजी पार्कच्या मेळाव्यात गर्जना केली की, काँग्रेस आणि भाजपा हे दोघेही हिंदुत्ववादी आहेत. राहुल गांधी हे जनेऊधारी मवाळ हिंदुत्ववादी आहेत. तर भाजपा जहाल हिंदुत्ववादी आहे. त्यामुळे काँग्रेस आरएसएसला घटनेच्या कक्षेत आणायला तयार नाही. त्यामुळे आम्ही आता काँग्रेससाठी थांबणार नाही. आता वंचितांचे तुफान सत्तेला धडका दिल्याशिवाय राहणार नाही. दादरच्या शिवाजी पार्कमध्ये कधीही न आलेले लोक संघटीत होऊन जमले होते.
आदिवासी, कोळी, माळी, साळी, धनगर, पारधी, भटके विमुक्त, महादेव कोळी, धिवर कोळी अशा 18 पगड जाती आणि समाजाच्या लोकांनी आपल्या शक्तीचे विराट प्रदर्शन आज शिवाजी पार्कात केले. या मेळाव्याचे आकर्षनही आगळेवेगळे होते. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दिन ओवेसी बोलायला उभे राहताच मोबाईलच्या बॅटर्या पेटवून लखलख चंदेरी दुनियाच शिवाजी पार्कवर उतरली. आजच्या सभेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी भटक्या विमुक्त समजाला गुन्हेगार म्हणून गावकुसाबाहेर कसे कोंडण्यात आले त्याचा इतिहास सांगितला. तसेच हे सर्व वंचित समाजाचे भाग्य बदलायचे असेल तर आपल्याला व्यवस्था बदलावी लागेल. असे त्यांनी सांगितले. वंचित विकास आघाडीची सत्ता आली तर भटक्या विमुक्त आणि ओबीसींना दुप्पट कॉलरशीप द्यावी लागेल. शिक्षणावर 10 टक्केखर्च करावा लागेल. आदिवासी कुटुंबामध्येही सत्तेची कुटुंबे तयार झाली आहेत आणि गरीब आदिवासी नाडले जात आहेत.
प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, सेना, भाजपा आणि काँग्रेसराष्ट्रवादीच्या बिल्डरांनी आधी मुंबईतील झोपडपट्ट्या गिळल्या. आता त्यांची नजर कोळीवाड्यातील गावठाणावर आहे. निवडणूक झाली की या बिल्डरांचा जेसीपी कोळीवाड्यावर चालेल. अर्ध्या महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ आहे. त्या भागात पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकार तापी नदीचे 35 टीएमसी पाणी गुजरातला द्यायला चालली आहे. याबाबत मी शिवसेनेला सवाल विचारतो की, तुम्ही या प्रश्नावर भाजपाशी का भांडत नाही?
प्रकाश आंबेडकर यांनी आपला निवडणूक जाहीरनामा मांडताना सांगितले की, आम्ही सर्वांना शिक्षण मोफत करू, अलुतेदार- बलुतेदार हे कारागीर व कलाकार आहेत. त्यांना आम्ही कुठचेही तारण न घेता 90 टक्के कर्ज देऊ. यापूर्वी देशात संघ, भाजप आणि सेना यांची धर्माची सत्ता होती. आम्ही वंचित समाजाच्या समतेची सत्ता आणू.
राहुल गांधी हे स्वत:ला जनेउधारी ब्राह्मण समजतात. काँग्रेस हा वैदिक हिंदुत्ववादी आहे. तर भाजपा हा मनुवादी हिंदुत्ववादी आहे. त्यामुळे काँग्रेस संघावरती कारवाई करायला तयार नाही. संघाला घटनेच्या चौकटीत आणायला तयार नाही. आमचे मतभेद जागांसाठी नाही तर संघावरील कारवाईवरून आहे. आता आम्ही स्वातंत्र्य गमावणार नाही. आम्ही फारकाळ वाट न पाहता निवडणुका लढविणार आहे.
तर असदुद्दीन ओवेसी यांनी बोलताना पाकिस्तान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, उध्दव ठाकरे, शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर हा मौलाना नाही, तर सैतान आहे, अशी टीका केली. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी टीव्हीवर बसून सल्ले देऊ नये. आधी उरी, पठानकोट आता पुलवामात हल्ला झाला. त्यामुळे तुमच्या शब्दांवर आमचा विश्वास नाही, असे ओवेसी यांनी सांगितले.
पाकिस्तानी मंत्री म्हणतो युद्ध झाले तर मंदिरातील घंटा वाजणार नाही. तुम्ही भारताला ओळखले नाही. इथे जोवर मुस्लिम आहे, तोवर मशिदीत अजान, मंदिरातून घंटानाद, चर्चमधून प्रार्थनेचे सूर उमटत राहतील. ज्यावेळी देशाचा प्रश्न येतो त्यावेळी आम्ही एक असतो. त्यामुळे पाकिस्तानी नेत्यांनी भारतातील मुस्लिमांची काळजी करण्याचे सोडून द्यावे. तुमच्याकडे खायला काही नाही. आम्हाला कशाला शिकवता. आम्ही जिनाचे निमंत्रण धुडकावून भारतात राहिलो आहोत, असेही ओवेसी यांनी सांगितले.
70 वर्षात आमच्याशी न्याय झाला का? बाबासाहेबांनी जे संविधान दिले आणि राजकीय शक्ती बनण्याचे आवाहन केले. त्या संविधान विरोधात सवर्णांना दहा टक्के आरक्षण दिले. कोणी त्याला विरोध केला नाही. त्या रामदास आठवलेंनी तोंड उघडले ते फक्त चमच्यागिरी आणि जोक करण्यासाठी. आता तर युती झाल्यावर स्वतःच रडत आहेत की मला काही दिले नाही म्हणून. त्यांनी स्वतःला जोक बनवून घेतले आहे, अशी टीकाही त्यांनी केली. तसेच दलितांना न्याय कोण देणार? नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, राहुल गांधी, शरद पवार की ठाकरे. असा सवाल करत हे सारे पेशवे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सगळ्यांनी प्रकाश आंबेडकरांचे हात मजबूत करा. त्यांच्या नेतृत्वाखाली न्याय मिळेल, असे आवाहन असदुद्दीन ओवेसी यांनी उपस्थित जनतेला केले. यावेळी सभामंचावर रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर, माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील, आग्री समाजाचे नेते राजाराम पाटील, एमआयएमचे आमदार वारिस पठाण, इम्तियाज जलील यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.
-विलास भांबेडकर